भिवंडी : बीएनएन महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक विकास उबाळे यांनी अर्थशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त केली.
डॉ. उबाळे यांच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही केवळ शिक्षणाची आवड असल्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नगरपालिकेच्या शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळाच्या शहाड विभाग हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण कसेबसे पूर्ण करून पुढे आरकेटी महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले.
आर्थिक संघर्ष सुरू असतानाच डॉ. उबाळे यांनी बीएड, एमफिल, नेट असा शिक्षण प्रवास चालूच ठेवला आणि याच दरम्यान बीएनएन महाविद्यालयात ते अर्थशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. गेली १० वर्षे ते बीएनएन महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत असून, सध्या ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद नारनवरे यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व स्वखर्चाने पुस्तके देऊन डॉ. उबाळे यांना पीएचडी करण्यास प्रवृत्त केले.
शिक्षण सुरू असताना डॉ. उबाळे यांनी आंबेडकरी चळवळीशी कधी नाळ तोडू दिली नाही. आजही सामाजिक कार्यात झोकून देताना आंबेडकरवादी विचार कसा महत्त्वाचा आहे, हे पटवून देण्यासाठी, तसेच सामाजिक एकता निर्माण होऊन समाजातील वंचित घटकांचा विकास कसा होईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देतानाच शिक्षणच विकासाचा मार्ग आहे, ही जाणीव ते विद्यार्थ्यांना करून देतात. त्यांचे अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
डॉ. उबाळे यांना डॉक्टरेट मिळाल्याचे कळताच त्यांचे माजी विद्यार्थी पत्रकार मोनिश गायकवाड, जगन्नाथ ठक, ईश्वर खटाळ, अलिशा कसबे, साईनाथ यांनी डॉ. उबाळे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. उबाळे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.